महामार्गच्या राजुरी पुलाचे गर्डर कोसळले

बीड/प्रतिनिधी
नवगण राजूरी येथील पुलाचे उभे केलेले गर्डरच कोसळून पडले. पुल पूर्ण उभा राहण्याआधीच पडझड सुरु झाल्याने महामार्गाच्या कामाचा दर्जा उघडा पडला आहे. दरम्यान, या कामाची गुणनियंत्रकांमार्फत तपासणी करावी, महामार्गावरील इतर पुलांचे गर्डरही तपासणी शिवाय बसवू नयेत अशी मागणी होत आहे.
नगर जिल्हा आणि बीड जिल्ह्याला जोडणारा सर्वात जवळचा रस्ता खरंवडी ते नवगण राजूरी असा आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग व्हावा यासाठी मोठे प्रयत्न केले गेले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम हाती घेतल्याने त्यांच्या पुढाकारातून या रस्त्याला मंजूरी मिळाली. ३६१ (एफ) असा क्रमांक मिळाला. टेंडर होऊन हे काम ५ जून २०१८ रोजी प्रथमेश कन्स्ट्रक्शन आणि ए. सी. शेख कन्स्ट्रक्शनला मिळाले. ३६ किमीचा हा रस्ता डिसेंबर २०१९ मध्ये पूर्ण होेणे आवश्यक होता. मात्र, ३ वर्षांचा कालावधी उलटूनही अद्याप काम पूर्ण नाही. कामाचा दर्जाची निकृष्ट असून डीएलसीमध्ये सिमेंटचे प्रमाण कमी आहे. दरम्यान, राजूरी येथे या महामार्गावर पुल उभारणीचे काम सुरु आहे. हे कामही थातूरमातूर केले जात आहे. शुक्रवारी सायंकाळी या पुलावर उभा करण्यात आलेला गर्डर कोसळला.काम बंद असल्याने सुदैवाने कुणाला इजा झाली नाही. मात्र, यामुळे कामचा दर्जा उघडा पडला आहे. लाकडाचे टेकू देऊन हे गर्डर उभे केलेले दिसत आहेत. या महामार्गाचे कामही संथ गतीने सुरु असल्याने पावसाळ्याात नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.