वीजचोरीसाठी आकडा टाकलेल्या तारेला चिकटून दांपत्य ठार

बीड/प्रतिनिधी
शेतात चोरून वीज वापरण्यासाठी टाकलेल्या आकड्याच्या तारेला चिकटून सरपण आणण्यासाठी गेलेल्या तरुण दांपत्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पिंपळनेर पोलिस ठाणे हद्दीतील जरूड येथे घडली. दांपत्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या रामकिसन विश्वनाथ काकडेविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड तालुक्यातील जरुड येथील बबन विश्वनाथ काकडे या शेतकऱ्याने तारेच्या साहाय्याने वीज तारांवर आकडा टाकून वीज चोरी केली होती. सुमारे १ हजार फूट तार टाकून ही वीज चोरी होत होती. वैजिनाथ श्यामराव बरडे (३५) आणि शोभा वैजिनाथ बरडे (३०) हे गावातीलच दांपत्य सरपण आणण्यासाठी गावालगतच्या तलावाजवळ गेले होते. सरपण घेऊन परतत असताना पाऊस येण्याचा अंदाज दिसल्याने नेहमीचा रस्ता सोडून ते पायवाटेने घराकडे निघाले होते. काकडे यांच्या शेताजवळ येताच सोबत चालणाऱ्या दांपत्याचा पाय आकडा टाकलेल्या या तारांवर पडल्याने विजेचा जबर धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला.